Sunday, 27 October 2024
दे रे हरी.....
Saturday, 11 May 2024
मंगल गाणी मंजुळ गाणी ?
Thursday, 11 January 2024
बाकी नापासांचे काय ?
Tuesday, 25 July 2023
गारवाची पंचवीस वर्ष
Monday, 18 January 2021
बाबुल की दुवाएं लेती जा !
©सुधीर वि. देशमुख
अमरावती
१८/०१/२०२१
Thursday, 17 December 2020
कटिंग, पाटली व हिप्पीकट
लहापणी न्हावी काकाकडे गेलो की काका खुर्चीवर पाटली टाकायचे पाटलीवर बसने मला फार कमीपणाचे वाटायचे, आपण उगीच लहान असल्याची जाणीव होत असे. एकदा ती कसरत काकाची सुरु झाली की बस, मधे मधे मान आपण सरळ करायची तर काका दुसऱ्या बाजूला एकदम दाबायाचे. समजा त्याच बाजूला ठेवावी तर परत दुसऱ्या बाजूला दाबल्या जायची. नेमके कुठल्या बाजूला डोके ठेवावे हा प्रश्न मनात यायचा अवकाश की समोर एकदम झटक्यान डोकेे दाबल्या जाई व मागच्या बाजूच्या केसावर आक्रमण होई. बऱ्याचवेळा डोक्याला वाटेल तसे झटके देवून झाले की मग कैचीचे काम संपे, मग कैचिची जागा वस्तारा घेत असे. एकदा हा वस्तारा हातात आला की परत डोक्याला वाटेल तसे वाकवून होई कधी या वस्तऱ्यातुन एकदाची मुक्ती होते असे वाटायचे. कसे बसे एकदा हे वस्तरा पुराण संपले की मग सर्व शरीर झटकल्या जाई. मग ते केसाने माखलेले शरीर घरी आई च्या तावडीत जायचे. कटिंग करून काय आलो फार गुन्हा करून आल्यासारखे वाटायचे, या सर्व विधिंविषयी मला काही आक्षेप नव्हता, होता तो फक्त त्या खुर्चीवर पाटली टाकन्याचा. कधी एकदाचे आपण मोठे होतो व थेट खुर्चीवर बसून कटिंग करण्यास पात्र होतो असे सतत वाटायचे. त्या खुर्ची वर बसून मागच्या टेक्यावर आपले डोके टेकवायचं व कटिंग वाल्याने आपल्याला विचारत विचारत केस कापावे हे माझे तेव्हाचे स्वप्न होते. त्यावेळी मना सारखी हेयर कट ठेवण्याचे स्वातंत्र नव्हते. मी साधारण तीसरी मधे असेल, आम्ही त्यावेळी परतवाडाला राहत होतो, हिप्पी कट ची फैशन आली होती. देव आनंद च्या हरे कृष्ण हरे राम चा तो काळ होता. अमिताभ सारखे काही स्टार्स हिप्पी कट ठेवायचे. हिप्पी ठेवली तर पाटलीवर बसून कटींग करण्याच्या मानहानीला तेवढ़ीच अनुकम्पा मिळू शकेल असे मला वाटायचे. माझा मोठा भाऊ त्याकाळी महाविद्यालयात होता त्यामुळे दादाला असलेले स्वातंत्र आपल्यालाही मिळावे असे मला वाटायचे. शिवाय हिप्पी कट ठेवली की आपण या तरुण मुलांच्या गँग मधे हक्काने शामील होऊ असा माझा ग्रह होता. बाबा पोलिस विभागात त्यामुळे त्यांचा लांब केस ठेवन्यास भारी विरोध होता. मोठा भाऊ महाविद्यालयात गेल्या मुळे व तो अमरावतीला असल्यामुळे असेल कदाचित परंतु त्याला मात्र बाबांनी विरोध केला नव्हता. एकदा घरी बरेच आंदोलन केले, रडा-रडी फुगणे वैगरे प्रकार केले, तात्पुरता अन्नत्याग केला. परंतू बाबाला काही मागणी पटत नव्हती, शेवटी आई ने मध्यस्थी केली व बाबा हिप्पी कट साठी एकदाचे राजी झाले. त्या दिवशी मी कटिंग साठी पहिल्यांदा एवढा खुश होतो. आईचे तर सर्व लहान सहान कामे मी पटापट केली, जशी शेजारच्या काकूचे उसने आनलेले जिन्नस परत करने इत्यादी. त्या दिवशी कटींग वाल्या काकाच्या पाटलीवर मी खुशीत जाऊन बसलो. त्यांना वाटेल त्या दिशेने वाटेल तसे डोके दाबू दिले एकदम सहकार्य केले. एकदाची हिप्पी कट झाली. कटिंग करून येताना माझी देह बोली पार बदलून गेली होती, आता आपल्याला मोठ्या मुलांच्या गोष्टीत थेट सहभागी होता येइल असे वाटू लागले. मानेवर व कानावर येणाऱ्या त्या गुंडाळा झालेल्या केसांचे मला भारी कौतुक वाटत होते. त्या दिवशी काकाने पहिल्यांदाच डोक्याच्या मागे आरसा धरून माझे गोल गोल केलेले केस दाखवले. (मी पूर्ण सहकार्य केल्यामुळे असेल कदाचित) कान व मानेवर आलेले ते केस मिरवत मी माझ्याच तोर्यात होतो, परंतु माझा मानभंग दुसऱ्याच दिवशी झाला. मोठ्या मुलांनी एका खेळात मला कच्चा नींबू केले. कच्चा नींबू हा प्रकार फार विचित्र, बिन खात्याच्या मंत्री सारखा. खेळात स्थान तर मीळे परंतू आपल्या सहभागाची फारशी दखल घेतल्या जात नाही. लहान मुलांनी घरी जाउन आईचे डोके खाऊ नये व आपल्या खेळात काही विघ्न येवू नये म्हणून मोठ्या मुलांनी केलिली सोय म्हणजे कच्चा नींबू होय. याशिवाय बारीक चिरीक कामे करण्यासाठी ही बारकी पोर कामी येत होती. अलीकडे सरकार स्थापन्यात देखील या तत्वाची मदत होते. हिप्पी कटचा मोठ्या होण्यात फरसा उपयोग दिसत नव्हता. शाळेत मास्तरच्या हातात सहजच केस लागत होते त्यामुळे मिळू नये त्या गुन्ह्याची सुद्धा शिक्षा मिळू लागली होती. लांब केस असणारी मूलं बदमाशी करण्यात आघाडीवर असतात असा बहुतेकांचा समज असतो. जसे चश्मा असणारी मूलं हुशार असतात असे बऱ्याच लोकांना वाटते पुढे दहावीत मलाच चश्मा लागला व हा गोड गैरसमज माझ्यासह इतरांचा देखील दूर झाला. हिप्पीकटचे फायदे तर काही दिसत नव्हते परंतु तोटे जागोजागी जाणवत होते. मित्रांचे आई वडील वेगळ्याच नजरने पाहू लागले, शाळेत गुरूजीला जसे शस्त्र मिळाले होते तसेच घरी बाबालाही त्यांचा राग शांत करण्यास "केस" हाती लागली होती, तसेही त्यांच्या मनाविरुद्धच मी कटिंग केली होती.
या नंतर मात्र मी हिप्पी कट केली नाही एवढेच काय तर बरेच वर्ष म्हणजे (खरच मोठे होई पर्यंत) लांब केस सुध्दा ठेवले नाही. आज मुलाला कटिंग साठी घेवून गेलो कटिंगवाल्याने मुलाला पाटलीवर बसवले, मी मात्र मुलाकडे उगीच सहानभुतीने पाहू लागलो.
रविवार16/7/17
Like
Comment
Share
Comments
Comments
Sunday, 8 November 2020
"पुलकित "
©सुधीर वि. देशमुख
एखाद्या व्यक्तीची आपल्या आयुष्यात काय जागा असावी ? कधी कधी शब्दही थिटे पडतात. नकळत्या वयात अजाणतेपणी यांची पुस्तके हाती आली. माझा मोठा भाऊ यांचा भारी फॅन होता, यांच्या जवळ जवळ सर्व प्रकाशित ग्रंथांचा वैयक्तिक संग्रह भाऊकडे होता. असं आहे तरी काय यांनी लिहलेले, या उत्सुकतेपोटी मी यांची काही पुस्तके तेव्हा वाचली होती. एकदम सर्व समजत नव्हतं पण वाचतांना गंम्मत वाटायची. नंतर मात्र यांचं एकूण एक प्रकाशित साहित्य आपण वाचायचंच असं ठरवलं, हळूहळू मी ही माझ्या कडे काही पुस्तके जमवली. बरीचशी वाचली, काही परत परत वाचली, काही मोजकी अजूनही बाकी आहे. यासम हाच एवढंच आपण म्हणू शकतो. सुरवातीच्या काळात कारकुनी पासून तर प्राध्यापकी पर्यंत अनेक नोकरी केल्या. हे भारतीय दूरदर्शनचे पहिले निर्मिती प्रमुख होते. (पहिले प्रधानमंत्री पंडित नेहुरुजींची मुलाखतीच्या कार्यक्रमाची निर्मिती यांचीच) आकाशवाणी,दूरदर्शन, चित्रपट, नाट्य,एकपात्री सादरीकरण, संगीत, लेखन,भाषण, समाजसेवा अश्या अनेक क्षेत्रातील यांचा संचार बघितला तर आपण थक्क होतो. एक व्यक्ती एकाच आयुष्यात एवढं सर्व कसं काय निर्माण करू शकतो हा प्रश्न पडतो. कुठल्याही क्षेत्रात नवोदितांना सिद्ध करण्यासाठी प्रचंड त्रास होतो हे यांना माहीत होते. यांनी नवीन लोकांना मोकळ्या मनाने शाबासकी दिली. अनेक चांगल्या कलावंतांना माहराष्ट्राशी परिचित करून दिले. आपल्या संपूर्ण हयातीत कोणालाही जाणिपूर्वक दुखवले नाही, तर फक्त हसवलेच, पण मात्र आणीबाणीचा जिगरबाजपणे विरोध केला. पुढे जनता पक्षाचे सरकार आल्यावर सरकारपासून अलिप्त राहिले. सत्तेशी सलगी करून पदे पदरात पाडून घेणं यांना माहीत नव्हतं. तरी देखील यांच्या कर्तृत्वाच्या भरवश्यावर यांना संगीत, नाट्य व साहित्य इत्यादी क्षेत्रातील मानाची सर्वोच्च पदे मिळत गेली. आचार्य अत्रे म्हणतात यांच्या 'तुज आहे तुजपाशी' या एवढ्या एका नाटकासाठी मी यांना उत्कृष्ट नाटककार मानायला तयार आहे. आणि यांनी हे नाटक फक्त अडीच दिवसात लिहून पूर्ण केलं होतं. हे पदमभूषण , महाराष्ट्रभूषण तर आहेतच पण त्याही उपर समस्त मराठी जनतेचे लाडके आहेत. महाराष्ट्राचं "लाडकं व्यक्तिमत्व" म्हणून आजही मराठी जनता त्यांना अभिमानाने संबोधित करते. पुलस्पर्श न झालेला साहित्य प्रेमी कदाचितच आपल्या येथे असेल, आणि एखादा असेल तर तो साहित्यप्रेमी तरी नसेन. चार्ली चॅपलीन व गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची श्रद्धास्थान होती. चार्लीला तर शांततेचे नोबेल दयायला हवे असे ते म्हणायचे. गुरुदेवांच्या साहित्यवरील प्रेमापोटी चाळीशीच्या नंतर बंगाली शिकले. तिथे शांतिनिकेतनला जाऊन राहिले. समाज कार्य करणाऱ्या व्यक्तीबद्दल यांना प्रचंड आस्था होती, विनोबांच्या भूदान यात्रेच्या वेळी काही दिवस त्यांच्या सोबत बिहारला फिरले. बाबा आमटेंच्या आनंदवनला नियमित भेट द्यायचे. त्यांच्या पु ल देशपांडे फाउंडेशनने अनेक सामाजिक संस्थांना मदतीचा हात दिला, त्यांचे दातृत्व विशाल होते. मुक्तांगण पासून तर आमच्या अमरावतीच्या वजीर पटेल पर्यंत अनेक सत्पात्री संस्थेला/व्यक्तींना त्यांनी मुक्तहस्ते मदत दिली. पुलं आनंदयात्री होते, जगण्याचं मर्म त्यांना समजले होते, त्यामुळे ते लौकीक अर्थाने योगी नसूनही योगीप्रमाणे निर्मोही होऊन जगू शकले. त्यांच्या साहित्याने, कलेने आपलं जीवन पुलकित झालं आहे एवढंच आपण कृतार्थ भावनेने म्हणू शकतो. उद्या 'भेटलेल्या आयुष्याचे तू काय केलं?' असं नियतीने विचारलेच, तर 'मी पुलकित होऊन आलो आहे!', एवढं मात्र मी आत्मविश्वासाने सांगेल.
ता. क. :आज यांच्या वाढदिवसाला गुगलने यांचं डुडल ठेवून समस्त पुलप्रेमींना आनंदित केले आहे.
अमरावती
८/११/२०२०
Saturday, 26 September 2020
'तोचि पुरुष भाग्यचा'
गांधीजींच्या यशा मागचं एक महत्वाचं कारण सांगीतल्या जाते ते म्हणजे ते युवकांना रचनात्मक कार्यक्रम द्यायचे. एक कार्यक्रम संपला की त्यांची पुढीची दिशा व त्यासाठी करावयाच्या कृतींचा आराखडा तयार असायचा. त्यांच्या समर्थकांना ते सतत गुंतून ठेवायचे. सोबत स्वतःची व इतरांच्या मनाची मशागत विविध मार्गाने सुरूच असायची . हे झाले सार्वजनिक जीवणाबाबत. वैयक्तिक जीवनात देखील असंच असू शकतं का ? स्वतःच्या आयुष्यात स्वतःसाठी देखील असा दीर्घ पल्ल्याचा किंवा लघु पल्याचा आराखडा तयार असणे आवश्यक आहे का? आपण रोज सकाळी उठतो, सर्वच उठतात, अर्थात आयुष्य एका दिवसाने वाढले असेल तर. सकाळी जाग आल्यावर एवढया मोठया दिवसाचं आता मी काय करू, हा प्रश्न ज्या व्यक्तीच्या समोर निर्माण होतो तो माझ्या दृष्टीने दुर्दैवी व्यक्ती, तो मग कितीही धनवान असला तरी. मिळालेल्या वेळचं मी काय करू, हा प्रश्न जिथे निर्माण होतो तिथं उदासपणाचा, खिन्नतेचा जन्म होतो. मनुष्य सदा कदा आनंदी राहू शकत नाही हे जरी खरे असले तरी ज्याच्या कडे वैयक्तिक कामाची यादी नाही, तो जीवनाला लवकर कंटाळु शकतो. खूप मोठे धेय्यच असले पाहिजे असं नाही. आपण सर्वांनीच काहीतरी भव्य दिव्य केलं पाहिजे असंही नाही. नवनवीन चांगलं करत राहण्याची, नवनवीन अनुभव घेण्याची हौस माणसाला जगवतं ठेवत असते. कुठलेही श्रम न करता पदरात प्राप्त झालेल्या क्षणाचा उपयोग जो घेऊ शकतो तोच काही तरी निर्माण करू शकतो. थोडक्यात काय तर मनाची गुंतवणूक आवश्यक आहे. कुठलंही रचनात्मक/विधायक काम करत असताना वेळ कसा निघून गेला हे ज्याला कळत नाही, त्याचे आयुष्यही असेच हसतखेळत निघून जाते. एखादं चित्र काढतांना, काही तरी चांगलं वाचतांना, बागकाम करतांना, घर स्वच्छ करतांना, चांगलं गाणं ऐकतांना, बाळाचे स्नान करून देतांना, पाळीव प्राण्याची काही सेवा करतांना (यादीत खूप काही मिळवता येईल ) मिळणारा आनंद, विकार रहित असतो. छोट्या छोट्या कामाची का असेना पण काहीतरी योग्य कृतींची यादी असणे आवश्यक आहे, नाही तर आयुष्य ओझं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच वैयक्तिक आयुष्यात, सकाळी उठल्यावर दिवसभर गुंतवून घेण्यासाठी ज्याच्या कडे कार्यक्रम आहे, 'तोचि पुरुष भाग्यचा'.
©सुधीर वि. देशमुख
अमरावती
२७/०९/२०
'तोचि पुरुष भाग्यचा'
गांधीजींच्या यशा मागचं एक महत्वाचं कारण सांगीतल्या जाते ते म्हणजे ते युवकांना रचनात्मक कार्यक्रम द्यायचे. एक कार्यक्रम संपला की त्यांची पुढीची दिशा व त्यासाठी करावयाच्या कृतींचा आराखडा तयार असायचा. त्यांच्या समर्थकांना ते सतत गुंतून ठेवायचे. सोबत स्वतःची व इतरांच्या मनाची मशागत विविध मार्गाने सुरूच असायची . हे झाले सार्वजनिक जीवणाबाबत. वैयक्तिक जीवनात देखील असंच असू शकतं का ? स्वतःच्या आयुष्यात स्वतःसाठी देखील असा दीर्घ पल्ल्याचा किंवा लघु पल्याचा आराखडा तयार असणे आवश्यक आहे का? आपण रोज सकाळी उठतो, सर्वच उठतात, अर्थात आयुष्य एका दिवसाने वाढले असेल तर. सकाळी जाग आल्यावर एवढया मोठया दिवसाचं आता मी काय करू, हा प्रश्न ज्या व्यक्तीच्या समोर निर्माण होतो तो माझ्या दृष्टीने दुर्दैवी व्यक्ती, तो मग कितीही धनवान असला तरी. मिळालेल्या वेळचं मी काय करू, हा प्रश्न जिथे निर्माण होतो तिथं उदासपणाचा, खिन्नतेचा जन्म होतो. मनुष्य सदा कदा आनंदी राहू शकत नाही हे जरी खरे असले तरी ज्याच्या कडे वैयक्तिक कामाची यादी नाही, तो जीवनाला लवकर कंटाळु शकतो. खूप मोठे धेय्यच असले पाहिजे असं नाही. नवनवीन चांगलं करत राहण्याची, नवनवीन अनुभव घेण्याची हौस माणसाला जगवतं ठेवत असते. कुठलेही श्रम न करता पदरात प्राप्त झालेल्या क्षणाचा उपयोग जो घेऊ शकतो तोच काही तरी निर्माण करू शकतो. थोडक्यात काय तर मनाची गुंतवणूक आवश्यक आहे. कुठलंही रचनात्मक काम करत असताना वेळ कसा निघून गेला हे ज्याला कळत नाही, त्याचे आयुष्यही असेच हसतखेळत निघून जाते. एखादं चित्र काढतांना, काही तरी चांगलं वाचतांना, बागकाम करतांना, घर स्वच्छ करतांना, चांगलं गाणं ऐकतांना, बाळाचे स्नान करून देतांना (यादीत खूप काही मिळवता येईल ) मिळणारा आनंद, विकार रहित असतो. छोट्या छोट्या कामाची का असेना पण काहीतरी योग्य कृतींची यादी असणे आवश्यक आहे, नाही तर आयुष्य ओझं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच वैयक्तिक आयुष्यात, सकाळी उठल्यावर दिवसभर गुंतवून घेण्यासाठी ज्याच्या कडे कार्यक्रम आहे, 'तोचि पुरुष भाग्यचा'.
©सुधीर वि. देशमुख
अमरावती
२७/०९/२०
Sunday, 20 September 2020
रुपयाचे चणे आणि बरच काही !
शाळेच्या मधल्या सुटीची बेल झाली की एकच आवाज होत होता. सर्व वर्गातील मुलं गोठ्यातील जनावरं बाहेर पडावी तसे ओरडतच बाहेर निघायची. शाळेच्या मैदानात गर्दी जमायची. दोन अडीच तासा पूर्वी शिस्तीत प्रार्थनेसाठी उभ्या असलेल्या मैदानात सर्वबाजूने एकच गोंधळ होत होता. कोणी खेळण्यात गर्क तर कोणी काड्या करण्यात मग्न. (काही लोकांची ही खोड मोठं झाल्यावर जात नाही हा भाग निराळा) मग अचानक लक्ष जायचं ते शाळेच्या प्रांगणात भोवताल उभ्या असलेल्या खाद्य विक्रेत्यांकडे. कोणी टोपलीत पोंगे घेऊन असायचा तर कोणी सायकल वर खारे शेंगदाणे. बुड्डी का बाल अर्थात शुगर कँडी पण असायची. ही कँडी थेट खाण्यापेक्षा खेळत खेळत खाण्यात जास्त मजा यायची. आमच्या शाळेत एक म्हातारी चणे घेऊन यायची. साधारण चार आण्यापासून तर एक रुपया पर्यंत चणे मिळायचे. आपलं बजेट पाहून चणे घ्यायचे व सोबत मनमुराद आनंद. चणे घेऊन दुसऱ्या सोबत्यांसमोर खाण्यात भारी गम्मत वाटायची. कधी कधी वाटणी पण व्ह्यायची. चणे शेयर केले की वर्गात त्याचा नवीन कम्पास वापरायला मिळायचा. कागदावरचे ते चणे तो स्वाद आजही विसरता येणे शक्य नाही. 'Song has the longest life' अशी इंग्रजीत म्हण आहे. मला वाटतं काही स्वादाला देखील असेच लांब जीवन आहे.
आज गम्मत म्हणून परत चणे तसेच पेपरच्या तुकड्यावर घेऊन बघितलं, अर्थात ती मजा कुठे येणार लगेच ऍसिडिटी इत्यादीची आठवण होते. लहानपणी नसतात असे कोणी शत्रू. 'School was the true vaaccation of my life' असं काहीसं कुठल्या तरी लेखकानं म्हटलं आहे. खरंच आहे पण वर्तमानात शाळा बंद आहेत आणि ही बंदी आता मुलांना व पालकांना नकोशी झाली आहे. हे असलं सक्तीचं व्हेकेशन मुलांना नकोय. सहज आठवलं शाळेच्या मधल्या व नंतरच्या सुट्टीवर आपलं पोट भरणारे विक्रेते काय करत असतील हल्ली ?
सुधीर वि. देशमुख
अमरावती
२०/९/२०२०
Friday, 28 August 2020
डावखुरा
डावखुरा हा जन्मतःच डावा असतो त्यासाठी खरतर वेगळं काही करावं लागतं नाही. फार सोपं असत डावखुरा होणं, पण डावखुरा होऊन जगणं मात्र तेवढंच कठीण. शाळेत एका डेस्क बेंचवर तीन मुलं बसायची शेजारच्या मुलाचा हात सतत लागायचा त्यामुळे लिहण्यास सतत त्रास होत होता. हॉकी खेळायला गेलो तर हॉकी उजव्या बाजूने खेळता येईल अशी डिजाईन केलेली, कात्री वापरायला गेलो तर परत तीच समस्या. क्रिकेट खेळतांना मात्र जरा भाव मिळायचा. आपल्याकडे डाव्या हाताला विशेष कामासाठी न वापरण्याची परंपरा आहे, प्रसाद घेण्यासाठी डावा हात समोर केला तर लगेच हटकतात. एकीकडे टाळी एका हाताने वाजत नाही म्हणायचं आणि दुसरीकडे डाव्या लोकांना सावत्र वागणूक. मी जवळजवळ सातव्या वर्गात पोहचे पर्यंत डाव्या हातानेच जेवण करायचो नंतर पंगतीत जेवतांना फार त्रास होत होता विशेषतः ग्रामीण भागात. हळूहळू काही ठराविक कामे उजव्या हाताने व काही कामे डाव्या हाताने करायची सवय केली. पुढे डाव्या लोकांची खूप मोठी संख्या आहे कळलं, एवढंच नाहितर डावे लोकं सर्जनशील वैगरे असतात असेही कळलं, खरं खोटं देव जाणे. एखादा आयुष्यभर पंचर जोडणारा, दरिद्रीत जीवन जगणारा, व्यक्ती ज्यावेळी बरकत होणार नाहीच्या भीतीने डाव्या हाताने पैसे घेत नाही त्यावेळी मात्र फार वाईट वाटतं, मग हटकून त्यांना उजव्या हाताने पैसे दयावे लागतात. आयुष्यभर असा बरकतचा नियम पाडणारा हा अजूनही एवढा दारिद्री कसा? हा विचार मनाला भेडसावत राहतो. आज जागतिक डावखुरा दिवस आहे म्हणतात, आपलाही एक दिवस येईल
असं वाटलं नव्हतं. तर जागतिक डावखुऱ्या दिवसाच्या माझ्या सारख्या डाव्या (हाताने )लोकांना हार्दिक शुभेच्छा.
'शांत न होणारी धग'
उद्धव शेळके यांची 'धग' ही कादंबरी मराठी साहित्यातील क्लासिक आहे. विदर्भाच्या ग्रामीण पार्श्वभूमीवर असलेली ही कादंबरी एका सामान्य स्त्रीच्या असामान्य संघर्षमय जीवनाचा शोकांतिक प्रवास आहे. मी फार पूर्वी पंधरा एक वर्षांपूर्वी ही कादंबरी वाचली होती, त्याच वेळी ही कादंबरी मनात जागा करून गेली. त्यानंतर अलीकडेच ही संघर्षमय जीवनगाथा वाचली, अनेक दिवस मन या कादंबरीतून बाहेर निघत नव्हते. वाचता वाचता कधी आपण कौतिकच्या जीवनाशी समरस होतो कळत नाही. एक एक पात्र आपल्या देखत संवाद साधत आहे असा भास झाल्याशिवाय राहत नाही. ही ग्रामीण भागातील एका स्त्रीची धगधगती कहाणी वाचून झाल्यावर मी अनेक दिवस अस्वस्थ झालो होतो, काही केल्या कौतिक डोक्याच्या बाहेर निघत नव्हती. कादंबरीतला एक एक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहत होता. कौतिकची धळपड, वेदना, परिस्थितीशी दोन हाथ करतांना होणारी फरफट, आपलीच असावी एवढी सच्ची ही कादंबरी आहे. कौतिकच भूत सहजासहजी उतरत नव्हतं. आपल्या फाटक्या संसाराला ठिगळं लावण्यासाठी धावणाऱ्या अनेक स्त्रिया अवती भवती दिसतात, तेव्हा कौतिकची आठवण आल्याशिवाय राहात नाही. संसाराची विलक्षण ओढ निसर्गाने स्त्रीला पुरुषापेक्षा जास्त दिली असावी,कर्ता पुरुष बेजबाबदार पणे वागला तर संसाराचा भार स्त्रीच्या खांद्यावर येतो. आत्महत्या केलेल्या पुरुषाची स्त्री त्याच्या नंतर आपल्या मोडक्या तोडक्या प्रपंचाचा गाढा ओढतेच ना.
'धग' ही शिंपी समजातील महादेव व कौतिकची
कथा असली तरी कथेची नायिका कौतिकच आहे. तिच्या माहेरची लोकं, तिचा सासरा रघुनाथ शिंपी, तिची मुलं भीमा, नामा, यसोदा, तिचे शेजारी सीता, सुकदेव नंतरच्या काळात ती ज्यांच्या घरी राहते ते कासीम व सकिनाचं कुटुंब इत्यादी सर्व पात्र आपल्या समोर लेखकाने सहज उभी केली आहे. बहुतेकांनी ही कादंबरी वाचली आहे, अनेकांनी अभ्यासली आहे, यावर भरभरून लिहलेले आहे. उत्कृष्ट साहित्याचा अस्सल नमुना ही
कादंबरी आहे , ज्यांनी अजूनही वाचली नसेल त्यांनी 'धग' अवश्य वाचावी.
सुधीर वि. देशमुख
अमरावती
२९/०८/२०२०
Thursday, 23 July 2020
ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता
प्रातिभावन्त लेखक वि. स. खांडेकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेलं हे गीत त्यांचीच पटकथा असलेल्या 'माणसाला पंख असतात' या १९६१ साली आलेल्या आशयघन चित्रपटातील आहे. सामाजिक विषयावर आधारित असलेल्या या प्रेमपटातील हे गीत, आस्तिक तथा धेय्यवादाचे पुरस्कर्ते असणाऱ्या खांडेकरांच्या दैवी प्रतिभेचा विलक्षण अविष्कार आहे. चित्रपटातील नायक कवी असून हे गीत म्हणजे त्याची 'बेट' कविता आहे. एका प्रसंगात नायिका कवितेचा अर्थ विचारते त्यावेळी नायक तिला सांगतो ही कविता म्हणजे सामाजिक दृष्ट्या वंचीत असणाऱ्या समाजाची आर्जव आहे. बेटरुपी या वंचितांची समाजरूपी समुद्राला ही हाक आहे, त्यांना जवळ घेण्याची, त्यांचे हक्क त्यांना देण्याची.
ये जवळी घे जवळी
प्रिय सखया भगवंता
वेढुनि मज राहसि का
दूर दूर आता
रे सुंदर तव तीरी
जग हिरवे धुंद उरी
पातेहि न गवताचे
शोभवि मम माथा
निशिदिनि या नटुनि थटुनि
बघ नौका जाति दुरुनि
स्पर्शास्तव आतुर मी
दुर्लभ तो हाता
मीना मंगेशकर अर्थात मीना खडीकर यांनी या गीताला एकदम भारी चाल दिली आहे. लता दिदींचं एवढं सुंदर गाणं त्यांच्या इतर मराठी क्लासिक गाण्यांसारखं प्रासिद्ध का नाही झालं याचं नवल वाटते. उषा किरण या बोलक्या डोळ्याच्या अभिनेत्रीवर चित्रित झालेलं हे गीत नेत्राला व कानाला अप्रतिम भेट आहे. हे गीत ऐकतांना नकळत चोखामेळा सारख्या संतकवीने भगवंतांला आपल्या अभंगातून दिलेल्या आर्त हाकेची आठवण येते.
चमचमती लखलखती
तव मंदिरी दीप किती
झोपडीत अंधारी
वाचु कशी गाथा
खाली लिंक दिली आहे अवश्य आनंद घ्या.💐
सुधीर देशमुख
अमरावती
२४/७/२०२०
https://youtu.be/hKNSU4e3Pp4
Wednesday, 22 July 2020
जागून ज्याची वाट पाहिली !
सुधीर वि. देशमुख
दे रे हरी.....
मागे एकदा मी आमच्या शहरातील आळशी लोकांची बैठक बोलावली होती. सभेला एकही आळशी आला नाही. सभेला एकही आळशी नसल्यामुळे मलाच स्वतःला सभा घ्यावी ला...
-
" सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझीच मी वाट पाहात आहे अजूनही वाटते मला अजूनही सांज रात आहे ." कवी सुरेश भट यां...
-
# दुभंगलेली_घरे आज दुकानात पनीर घ्यायला गेलो तिथे काकाही आले होते. मी पनीर घेतलं व काकाने दही. काका एकदम रोड झाले होते, खांदे झुकली होत...
-
मागे एकदा मी आमच्या शहरातील आळशी लोकांची बैठक बोलावली होती. सभेला एकही आळशी आला नाही. सभेला एकही आळशी नसल्यामुळे मलाच स्वतःला सभा घ्यावी ला...




