Friday 28 August 2020

डावखुरा

 डावखुरा हा जन्मतःच डावा असतो त्यासाठी खरतर वेगळं काही करावं लागतं नाही. फार सोपं असत डावखुरा होणं, पण डावखुरा होऊन जगणं मात्र तेवढंच कठीण. शाळेत एका डेस्क बेंचवर तीन मुलं बसायची शेजारच्या मुलाचा हात सतत लागायचा त्यामुळे लिहण्यास सतत त्रास होत होता. हॉकी खेळायला गेलो तर हॉकी उजव्या बाजूने खेळता येईल अशी डिजाईन केलेली, कात्री वापरायला गेलो तर परत तीच समस्या. क्रिकेट खेळतांना मात्र जरा भाव मिळायचा. आपल्याकडे डाव्या हाताला विशेष कामासाठी न वापरण्याची परंपरा आहे, प्रसाद घेण्यासाठी डावा हात समोर केला तर लगेच हटकतात. एकीकडे टाळी एका हाताने वाजत नाही म्हणायचं आणि दुसरीकडे डाव्या लोकांना सावत्र वागणूक. मी जवळजवळ सातव्या वर्गात पोहचे पर्यंत डाव्या हातानेच जेवण करायचो नंतर पंगतीत जेवतांना फार त्रास होत होता विशेषतः ग्रामीण भागात. हळूहळू काही ठराविक कामे उजव्या हाताने व काही कामे डाव्या हाताने करायची सवय केली. पुढे डाव्या लोकांची खूप मोठी संख्या आहे कळलं, एवढंच नाहितर डावे लोकं सर्जनशील वैगरे असतात असेही कळलं, खरं खोटं देव जाणे. एखादा आयुष्यभर पंचर जोडणारा, दरिद्रीत जीवन जगणारा, व्यक्ती ज्यावेळी बरकत होणार नाहीच्या भीतीने डाव्या हाताने पैसे घेत नाही त्यावेळी मात्र फार वाईट वाटतं, मग हटकून त्यांना उजव्या हाताने पैसे दयावे लागतात. आयुष्यभर असा बरकतचा नियम पाडणारा हा अजूनही एवढा दारिद्री कसा? हा विचार मनाला भेडसावत राहतो. आज जागतिक डावखुरा दिवस आहे म्हणतात, आपलाही एक दिवस येईल 😜असं वाटलं नव्हतं. तर जागतिक डावखुऱ्या दिवसाच्या माझ्या सारख्या डाव्या (हाताने )लोकांना हार्दिक शुभेच्छा.

डावखुरा
सुधीर वि.देशमुख
१३/०८/२०

'शांत न होणारी धग'

 उद्धव शेळके यांची 'धग' ही कादंबरी मराठी साहित्यातील क्लासिक आहे. विदर्भाच्या ग्रामीण पार्श्वभूमीवर असलेली ही कादंबरी एका सामान्य स्त्रीच्या असामान्य संघर्षमय जीवनाचा शोकांतिक प्रवास आहे. मी फार पूर्वी पंधरा एक वर्षांपूर्वी ही कादंबरी वाचली होती, त्याच वेळी ही कादंबरी मनात जागा करून गेली. त्यानंतर अलीकडेच ही संघर्षमय जीवनगाथा वाचली, अनेक दिवस मन या कादंबरीतून बाहेर निघत नव्हते. वाचता वाचता कधी आपण कौतिकच्या जीवनाशी समरस होतो कळत नाही. एक एक पात्र आपल्या देखत संवाद साधत आहे असा भास झाल्याशिवाय राहत नाही. ही ग्रामीण भागातील एका स्त्रीची धगधगती कहाणी वाचून झाल्यावर मी अनेक दिवस अस्वस्थ झालो होतो, काही केल्या कौतिक डोक्याच्या बाहेर निघत नव्हती. कादंबरीतला एक एक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहत होता. कौतिकची धळपड, वेदना, परिस्थितीशी दोन हाथ करतांना होणारी फरफट, आपलीच असावी एवढी सच्ची ही कादंबरी आहे. कौतिकच भूत सहजासहजी उतरत नव्हतं. आपल्या फाटक्या संसाराला ठिगळं लावण्यासाठी धावणाऱ्या अनेक स्त्रिया अवती भवती दिसतात, तेव्हा कौतिकची आठवण आल्याशिवाय राहात नाही. संसाराची विलक्षण ओढ निसर्गाने स्त्रीला पुरुषापेक्षा जास्त दिली असावी,कर्ता पुरुष बेजबाबदार पणे वागला तर संसाराचा भार स्त्रीच्या खांद्यावर येतो. आत्महत्या केलेल्या पुरुषाची स्त्री त्याच्या नंतर आपल्या मोडक्या तोडक्या प्रपंचाचा गाढा ओढतेच ना.

 कादंबरीतील संवाद साधे आहेत, सरळ आहेत आणि एकदम थेट आहेत. लेखकाने भाषा अलंकारिक करण्याचा, संवादात उगीच तत्व पेरण्याचा कुठलाही प्रयत्न केलेला नाही. जे काही आहे ते सर्व नैसर्गिक आहे, बोली भाषेतील म्हणी व वाक्प्रचार यांच्या सुयोग्य वापराने संवाद जबरदस्त प्रभावी झाले आहेत. उद्धव शेळके यांच्या नावावर अनेक ग्रंथ आहेत, त्यांनी एक 'धग' जरी लिहली असती तरी त्यांना श्रेष्ठ कादंबरीकार म्हणावं एवढी उल्लेखनीय ही कादंबरी आहे.

'धग' ही शिंपी समजातील महादेव व कौतिकची कथा असली तरी कथेची नायिका कौतिकच आहे. तिच्या माहेरची लोकं, तिचा सासरा रघुनाथ शिंपी, तिची मुलं भीमा, नामा, यसोदा, तिचे शेजारी सीता, सुकदेव नंतरच्या काळात ती ज्यांच्या घरी राहते ते कासीम व सकिनाचं कुटुंब इत्यादी सर्व पात्र आपल्या समोर लेखकाने सहज उभी केली आहे. बहुतेकांनी ही कादंबरी वाचली आहे, अनेकांनी अभ्यासली आहे, यावर भरभरून लिहलेले आहे. उत्कृष्ट साहित्याचा अस्सल नमुना ही कादंबरी आहे , ज्यांनी अजूनही वाचली नसेल त्यांनी 'धग' अवश्य वाचावी.

सुधीर वि. देशमुख


अमरावती

२९/०८/२०२०

बाकी नापासांचे काय ?

त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न...