Monday 21 May 2018

वेडिंग फोटोग्राफी एक गम्मत


हल्ली लग्न लागल्यावर ती नवरा आणि नवरी फोटोग्राफर च्या ताब्यात द्यावी लागते, पाहुण्यांना त्यांच्याशी न बोलायची सोय ना शुभेच्छा द्यायची. अशा वेळी पाहुण्यांची नजर जेवणाकडे नाही वळली तर नवलच. तरी बर प्रीवेडिंग फोटोग्राफी आधीच काढून झालेली असते. प्रीवेडिंग फोटोग्राफी हा प्रकार कोणी शोधून काढला त्याला तर एकवीस तोफांची सलामीच दिली पाहिजे (सलामी नेहमी एकवीस तोफांचीच का देतात? गणपतीचा आणि एकवीस आकड्याचा सबन्ध माहीत होता, पण एकवीस आणि तोफेचा काय सबन्ध ? असो आपल्याला काय एकवीस तर एकविसच, तशाही सलामी द्यायला तोफा आहे कुठे?) तर आपण त्या प्रीवेडिंग फोटोग्राफी वर होतो. हल्ली बर्याच बाबी प्रीवेडिंग होतात म्हणून याचीही भरीस भर पडली असावी का? "आमच्या वेळेस नव्हतं बाई असले भलते चाळे" एका लग्नात एक आजी ठसक्यात म्हणाली. चा..ळे ? आजीला फोटोग्राफीचे हे कौंशल्य चाळे वाटत होते. मग आजीच्या घरी पाळणा कसा लांबला होता ? तो एवढा वेळा लांबला होता की, आजोबा पाळणा सतत बांधून ठेवत. एकदा तर एकाच घरात दोन पाळणे एक मायच्या लेकराला व एक तिच्या लेकीच्या लेकराचा. तरी देखील आजी या आधुनिक फोटोग्राफी शास्त्राला चाळे म्हणत होती, त्याचे कारणही तसेच आहे. आजीच्या नातीच्या लग्नात, नातीच्या डोक्यावर अक्षदा पडल्यावर कोणीतरी 'नारायण' टाइप कार्यकर्त्याने आजीला, नातीला व नातजवयाला आशीर्वाद देण्यासाठी स्टेज जवळ आणले होते, पण काय तो दृष्ट फोटोग्राफर त्याने नवरा नवरीचा असा ताबा घेतला की एक तास तरी सोडलेच नाही. कशीतरी त्या फोटोग्राफरच्या तावडीतून सुटका झाल्यावर आजी स्टेजवर जाईल तर मुलाकडच्या फोटोग्राफरने मोर्चा सांभाळला. नवरा मुलगा व नवरीला वेगवेगळ्या पोजेस घ्यायला लावून आता त्याला आपली स्किल सिद्ध करायची होती. नवरीकडचा फोटोग्राफर लहान गावातला हा महानगरातला, त्यात जास्त रेटचा, त्यामुळे नवरी कडच्या फोटोग्राफरने एक तास घेतल्यावर याला जास्त वेळ घेणे आवश्यक होतेच. त्याने दहा पोजेस घेतल्या तर याने पंधारा घेणेच होते. आजी बिचारी, नातीचं व नातजवायचे भावविभोर क्षण असहायपणे उघड्या डोळ्याने सर्वांसमोर पाहत होती, आजी चिडणार नाही तर काय? आजीच काय मुला मुलीला भेटायला आलेले सर्व पाहुणे तातकडत उभे होते पण फोटोग्राफरचे कोणाकडेही लक्ष नव्हतं. अर्जुनाला फक्त माशाचा डोळा दिसायचा तसे याला फक्त नवरा व नवरी.
एक काळ होता नवरा नवरीचा फोटो पाहुण्यांसोबत काढायची रीत होती. (नाही म्हणायला आजही आहे, पण दुय्यम ) आलेल्या पाहुण्यांतला कुणी सुटला तर नाही ना ? अशी काळजी दोन्हीकडच्या यजमानांना राहायची. एखादा 'बालीचा पाहुणा' फोटो काढायचा सुटला तर, केलेल्या सोयीची वाट लागायची. हल्ली मात्र एकदा लग्न ठरले की प्रीवेडिंग शूट पासून सुरू झालेली फोटोग्राफी संपता संपत नाही. तरी बर सेल्फी वैगरे साठी फोन असतातच.फक्त फोटोसाठीच लग्न काढले की काय असे या फोटोंना पाहल्यावर वाटत राहते. हल्ली लग्न झाल्यावर एकदोन महिन्याने कोणाकडे जाण्याचे मी टाळतो कारण गेल्यावर त्या फोटोग्राफरचा पराक्रम चहाच्या घोटासोबत पचवावा लागतो. त्या अल्बममध्ये आपण असण्याची शक्यता कमीच असते, दिसलोच तर एखाद्या कोपर्यात. आणि समजा अल्बम पासून सुटका झालीच तर फेबु आहेच की वेगवेगळी पोजेस पाहायला.
(तळतीप : हा लेख निवळ विनोद निर्माण करण्याच्या उद्देशाने लिहलेला आहे. कोणीही फार गंभीरतेने घेऊ नये, गंभीर वाटल्यास तो दोष लेखकाचा समजावा. )
©सुधीर वि. देशमुख
अमरावती
20/05/18

No comments:

Post a Comment

बाकी नापासांचे काय ?

त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न...